सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षकांना आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आधीच शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षकांना आदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आधीच शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्याध्यापकांवर आता आणखी एक जबाबदारीचे ओझे टाकण्यात आले आहे. शाळा परिसर स्वच्छते सोबतच भटक्या कुत्र्यांचा वावर कमी करणे, श्वान आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती करावी, भटक्या श्वानाचा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी म्हणून शाळा मुख्याध्यापकांची नेमणूक करावी, असे तोंडी निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना दिले आहेत.
दरम्यान, आधीच शासनाचे विविध उपक्रम, शाळाबाह्य उपक्रम, निवडणूक विषयक कामे यांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षक मुख्याध्यापक यांच्या खांद्यावर भटक्या श्वनाची नवीन जबाबदारी टाकल्याने शिक्षकांसह मुख्याध्यापक यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी थेट लेखी पत्र काढत मुख्याध्यापक यांच्यावर भटके जनावरे आणि श्वान यांची जबाबदारी सोपवली आहे.
देशभरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांची आणि त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रत्येक शैक्षणिक संस्थेने परिसर स्वच्छता व सुरक्षा यांच्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचे परिपत्रक काढले होते. याच धर्तीवर आता शालेय शिक्षण विभागानेही अशाच आशयाचे परिपत्रक काढले आहे. याच पत्राच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक विभागाने देखील जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा खाजगी शाळा यांच्या मुख्याध्यापकांना आदेश काढले आहे.
भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव व श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशान्वये जिल्हयातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमांच्या प्राथमिक/जि.प./मनपा शाळांचे मुख्याध्यापक यांना जिल्हास्तरावरुन नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. नियुक्त नोडल अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी संदर्भिय पत्राचे अवलोकन करुन सुमोटो याचिका निर्देशानुसार कार्यवाही करावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या पत्रानुसार जिल्हा परिषदेमार्फत आदेश आले आहे. जिल्ह्यात साडेपाच हजार सर्वमाध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांच्या आवर अथवा बाहेर कुत्र्यांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होणे, याबाबतची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली.
कृपया- बातमीबद्दल आपला अभिप्राय कळवावा.

COMMENTS